रत्नाकर मतकरी हे मराठीतील नामवंत गूढकथालेखक. डॉ. कृष्णा नाईक यांनी ‘सावल्यांच्या प्रदेशात’ या पुस्तकातून रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथेची समीक्षा केली आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला कथा या साहित्यप्रकाराची जडणघडण, तसेच गूढकथा आणि अन्य कथाप्रकारांचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत. .......
भयकथांमधील आशयसूत्र ‘भीती’ (Fear) हे असते. भीती ही एक भावना माणसाच्या मनाशी निगडित आहे. कोणत्याही व्यक्तीस नेमकी कोणत्या गोष्टीची भीती वाटेल याचे नेमके निदान करता येत नाही. सर्वसाधारण स्थितीत ‘भीती’ या भावनेस धमकी, धोका, दु:ख, इजा आदी कारणांनी मनात निर्माण होणारी क्लेशदायक भावना मानले जाते. याचा सरळ अर्थ असा होतो की, मनामध्ये ‘भीती’ ही भावना निर्माण होण्यासाठी मनाला क्लेशकारक ‘कोणते तरी’ कारण असले पाहिजे.
भीती म्हणजे ‘a feeling of anxiety concerning the outcome of something or the safety of someone.’ ‘भीती’ या भावनेच्या निर्मितीमागे ‘सुरक्षिततेचे’ कारण आहे. ‘भीती’च्या सर्वसाधारण व्याख्यांचा विचार केल्यास त्यांचा संबंध ‘मना’शी येत असल्याने मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून भीती या भावनेचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
मानसशास्त्रामध्ये ‘भीती’ या भावनेस ‘फोबिया’ म्हटले असून, फोबियाचे विविध प्रकार सांगितले आहेत. मानवी मनात ‘भीती’ या भावनेची निर्मिती होण्यासाठी ‘बाह्य कारणे’ निमित्त होतात. मानवी मनावर झालेले आघात (traumatic) भीती या भावनेस मानवी मनात जन्म देतात. तसेच काही वेळा मनात ‘अकारण’ कोणत्याही विशिष्ट बाह्य कारणाशिवाय ‘भीती’ ही भावना जन्म घेते. या ‘अनामिक भीती’ची कारणे शोधणे अवघड असते. भीती या भावनेच्या या दोन प्रकारांव्यतिरिक्त मानवी मनाच्या नेणिवेच्या स्तरात बंदिस्त असलेल्या श्रद्धा-विश्वासांमुळे निर्माण होणारी ‘भीती’ ही भावना स्वतंत्रपणे विचारात घ्यावी लागते. मानवी मनातील नेणिवेच्या स्तरावरील अनुभव, विश्वास, मते यांना तर्कशुद्ध आधार असतोच असे ठामपणे सांगता येत नाही. किंबहुना असा तर्कशुद्ध आधार नसल्यानेच भीतीची निर्मिती होते. तिची कारणमीमांसा देता येत नाही. परंतु व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनावर परिणाम मात्र होतो.
अशा प्रकारच्या भीतीचे मानसिक भीती, अतिमानुषतेमुळे निर्माण होणारी भीती, अस्तित्वाबद्दलची भीती, अपयशाची भीती, आदी विविध प्रकार मानले आहेत. मनुष्याच्या जन्मापासून ‘भीती’ ही भावना मानवी मनात असल्याने ‘भीती’ या भावनेचा आविष्कार भिन्न स्थितीत भिन्न स्वरूपात प्रकट होतो. साहित्य हे मानवी जीवनाशी निगडित असल्याने साहित्याच्या कोणत्याही प्रकारात ‘भीती’ या भावनेचे अस्तित्व कमी-अधिक प्रमाणात आढळते. ‘कथा’ हा साहित्यप्रकार त्यास अपवाद नाही. ज्या कथांचे आशयसूत्र ‘भय’ या भावनेभोवती गुंफलेले असते, अशा कथा ‘भयकथा’ या प्रकारात समाविष्ट केलेल्या आहेत. अशा भयकथा सर्व भाषिक वाङ्मयात लिहिल्या गेल्या आहेत.
मानवी मनात अतींद्रिय शक्ती, भूत, पिशाच्च अशा अतिमानवी स्वरूपांची असलेली भीती बहुतांशी अनुभवास येत असल्याने, अशा भयकथांची बैठक प्रामुख्याने अशा अतींद्रिय, अतिमानुषतेवर आधारलेली आढळते.
(‘सावल्यांच्या प्रदेशात’ हे डॉ. कृष्णा नाईक यांचे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)